आनंदे निर्भर डुल्लतसे
:
अमृताभक्तिप्रेमसुख प्राप्त झाले कीं मनुष्य अंतिम पारमार्थिक ध्येय (भगवद्प्राप्ती व भगवत्सेवाप्रेम) साध्य करतो. तो जन्ममरणाच्या फेर्यातून सुटतो. अमर होतो. भक्त स्वतःच अंगेकरून अमृतस्वरूप सत्वगुणाचा पुतळा बनतो आणि तो तृप्त, शांत, कृतार्थ होतो.
भक्तिप्रेमसुख हे नुसत्या पौरुष प्रयत्नाने मिळत नाही. मानवी प्रयत्नाने मिळवता येते त्याला भक्तिशास्त्रकार "यत्प्राप्य" म्हणतात. आणि ज्या गोष्टींची प्राप्ति होणे, हे मानवी प्रयत्नांच्या जोडीने, ईश्वराच्या कृपेवरच अवलंबून असते. त्यासाठी "यत् लब्ध्वा" असा शब्दप्रयोग करतात. खरे तर त्या कृपाळू, दयाघन भगवंताच्या कृपेशिवाय कांहीच मिळत नाही. आत्मसाक्षात्कार, सगुण भगवंताच्या रुपांत ईश्वराचा साक्षात्कार, आणि सायुज्यता मुक्तिच्याही मस्तकावर किरीटासारखी विराजमान होणारी भक्तिप्रेमा हे केवळ ईशकृपेनेच, श्रीगुरुकृपेनेच मिळतात. "यं एव एष वृणुते तेन लभ्यः" असंच कठोपनिषदकारांचेही सांगणे आहे.
विश्वरूप अर्जुनाच्या विनंतीस अनुसरून प्रकट केले भगवंतानी. पण अर्जुन केव्हा पाहूं शकला ते ? तर अर्जुनावर कृपादृष्टि होऊन त्याला जेव्हा दिव्यचक्षू मिळाले तेव्हा ना ? अशी त्या कृपावंत भगवंताची विशेषकृपा झाल्यावांचून, मायेच्या अतीत असणार्या परमसत्यस्वरूप परमात्म्याचे अत्यंत निरूपाधिक स्वरूप कधीच जाणतां येत नाही; अनुभविता येत नाही. भक्ताचार्य नारद म्हणतात "भगवंताची अत्यंत उत्कट प्रेमभावाने, निष्काम भक्ति कराल तर तुमची पात्रता एवढी वाढेल कीं तो भक्तिप्रेमाच्या भुकेचा पभूच स्वतः प्रयत्न होऊन आपले स्वरूप दाखवतो, आणि संवित्ज्ञान, मुक्ति आणि मुक्तीला लाभ आणणारे परम भक्तिप्रेमसुख भरभरून देतो.
ही परम प्रेमस्वरूप भक्ति आचरण्यास, भाषाभेद, वर्णभेद, वंशभेद, जातीभेद आणि कोणतेही भेद न मानता सर्वांनाच आचरण्यास पूर्ण मुभा आहे. "या रे या रे लहान थोर । याति भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी॥" तुकोबारायांची ग्वाही आहे - "सकळांसि येथे आहे अधिकार ।"
असा प्रेम प्रेमस्वरूप भक्ति करणारा भक्त हा सिद्ध होतो. व्यवहारांत सिद्ध याचा अर्थ सिद्धि प्राप्त झालेला. म्हणजे तरी काय ? तर जग रहाटीवेगळा कांहीतरी चमत्कार करून दाखविता येण्याचे सामर्थ्य. मंत्र - तंत्र, जप - जाप्य, तसेच अघोरी साधना यामुळे प्राप्त होते. अशा माणसाभोंवती नेहमीच गर्दी असते, त्यची वाखाणणी प्रशंसा होते, पण अंती नरकावस्था.
भक्ति शास्त्रकारांनी सिद्ध शब्दाचा अर्थ फार सुंदर सांगितला आहे. सिद्ध होणे म्हणजे परम प्रेमरूपभक्तिने संपन्न होऊन हरिप्राप्ति साधणे. अशा भक्ताला भगवंत हेच साध्य प्राप्त झालेले असल्याने अन्य कांही साध्य उरतच नाही. आणि त्यामुळे तो तृप्त होतो. गंगा सागराला मिळाली की तिचा पुढचा प्रवासच खुंटतो ना ? अगदी तसंच भक्ताच. मग तो सगळा उर्वरीत काळ परमानंदात, भक्तिप्रेमसुख अनुभविण्यांत, भगवद्सेवेत घालवतो.
आता हा अनन्य भक्त पूर्ण तृप्त होतो तरी कसा ? तर अंतःकरणाचे सर्व भाव, विचार व चिंतन एका भगवंताकडे वळविल्यानंतर मन, बुद्धि, इंद्रिये यांची धावच कमी होते. आणि शेवटी हरि-साक्षात्कार झाल्यावर तर काय "परं दृष्ट्वा निवर्तते ।" मग भक्त पूर्ण शांत, तृप्त व समाधानाने सर्वांगाने अलंकृत होतो. "सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार । आनंदे निर्भर डुल्लतसे ॥" सर्व आशा आकांक्षा लय पावतात. द्वेष, मत्सर, क्रोध, दुःख अस्तंगत होतात.
असा भक्त अमृतस्वरूप होतो, म्हणजे अमृतासारखाच गोड, मधुर, सर्वांना हवा हवासा वाटणारा व सर्वजनप्रिय होतो. रज-तम गुणांचा निरास झाल्याने, शुद्ध सत्त्वगुणांचा पुतळा होतो. त्यच्या अंगकांतीद्वारे बोलण्यात चालण्यात वागण्यात विलक्षण आनंद प्रेमळपणा प्रकटतो. त्याच्या भोवतालचे वातावरण मांगल्याने भरून जाते. पराशांतीचे साम्राज्यच त्याचे रूपानें नांदत असते. अमृत म्हणजे अमर. यालाच मोक्ष, निर्वाण म्हणतात. पण हा भाग्यवान भक्त मोक्ष मिळूनही हरिनाम गाण्याकरितां, भगवद्सेवेसाठी, भक्तिप्रेम सुखासाठी पुनः पुनः जन्म घेण्यास भीत नाही. तर उलट प्रतिज्ञापूर्वक या प्रेमभक्ति सेवेसाठी जन्माला येतो.
अण्णा -
No comments:
Post a Comment