14 December, 2008

मानसमणिमाला (१४)

मानसमणिमाला (१४)


हिंदी : खल अघ अगुन, साधु-गुन गाहा । उभय अपार उदधि अवगाहा ॥
तेहि तें कछु गुनदोस बरवाने । संग्रह त्याग न बिनु पहिचाने ॥ बा. कां. १.५.२
मराठी : खल अध अगुण साधुगुण वर्णन । दोन अपाय पयोधि च ठाव न ।
म्हणुन अल्प गुण दोष वानले । त्याग न संग्रह विना जाणले ॥

अर्थ : खलांच्या पापांचे, अवगुणांचे वर्णन व साधुंच्या गुणांचे वर्णन (गाथा) हे दोन्ही अपार अगाध सागरच आहेत. म्हणून मी त्यांचे थोडे थोडकेच वर्णन करीत आहे. त्याचे कारण असे की अवगुणांचा, दोषांचा त्याग किंवा सद्‌गुणांचा स्वीकार ते जाणल्याखेरीच करताच येत नाही.

या जगांत असंख्य सद्‌गुण व असंख्य दुर्गुण आहेत. जणू ते दोन महासागरच ! सर्व जग हे गुणावगुणांनीच भरलेले आहे. ईश्वरानेंच सृष्टि निर्मिती करतांना सत्त्व, रज, तम या तीन गुणांनी युक्त अशीच केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पदार्थ, वस्तू, प्राणी, मनुष्यमात्र तिन्ही गुणांनी युक्त असतात. परंतु मनुष्याला मात्र या तीनही गुणांतून निर्माण होणारे असंख्य सद्‌गुण वा दुर्गुण यांचे ज्ञान करून घेता येते. या ज्ञानाच्या सहाय्याने त्याला आपली उन्नती करता येते.

आपल्या मधील दोष, अवगुण ओळखता आले पाहिजेत, तरच त्यांचा त्याग करता येईल तसेच इतरांचे गुण ओळखता आले पाहिजेत, तर त्यांचे अनुकरण करता येईल. समर्थ म्हणतात - 'या कारणे करंट लक्षणे । ऐकोनी त्यागचि करणे । म्हणिजे कांही एक बाणे । सदेवलक्षण ॥ दास. १९.३.३
परंतु साधारणतः मनुष्य उलटेच करतो. इतरांचे सद्‌गुण न बघतां केवळ दोषदर्शन, वर्णन इतके सतत चालते कीं ते दोष स्वतः मध्येंच केव्हां येऊन रुजले ते त्याला कळतही नाही. त्यामुळे स्वतःच्या सद्‌गुणांनाही तो मुकतो. स्वतःच्या दोषांचे अलिप्तपणे मूल्यमापन करता आले पाहिजे व कठोरपणे त्याग करता आला पाहिजे. इतरांच्या दोषांचे मूल्यमापन सहृदयतेने करून त्यांचा अलिप्ततेने स्वीकार अगर अस्वीकार करता आला पाहिजे.

तसेच आपल्या सद्‌गुणांचा खूप बडेजाव न करता ते ओळखून त्यांचा सदुपयोग करता आला पाहिजे व इतरांच्या सद्‌गुणांचा मान राखता आला पाहिजे. परंतु त्याकरिता गुण - अवगुण अलिप्तपणे शोधतां आले पाहिजेत व त्यातून बोध घेऊन त्यांचा त्याग-स्वीकार केला पाहिजे. 'हिताऽहिता पशुपादी जाणती । मनूज-तनू गुणबोध खाण ती ॥ असे गोस्वामी म्हणतात ते याचकरिता.

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: