18 December, 2008

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं


देवकार्य, धर्मकार्य वा समाजकार्य यात "मम" म्हणणर्‍यांचा वाटा मोठा असतो, पण "मम"च्या जागी "इदं न मम" अशा भूमिकेवर येणं हे फार मोठं सौभाग्य, महत्‌भाग्य. श्रीगुरुज्ञानोबारायांनी dichotomisingचा, अध्यात्मातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत अनुभवांतून, आपल्या साहित्यांत जागोजागी मांडला आहे. म्हणजे एक आत्मारामच स्वतः आपल्याला आपल्यातच विभागून आपल्यालाच पाहतो, अनुभवतो, भक्तिप्रेमाचा आनंद अनुभवतो. आता माया धरून बसलेला आत्माच बाहेर येऊन परमात्मस्वरूपाने नटतो, दर्शन देतो. असा हा आत्मा - भगवंतच. मग रूप, रस, गंध, नाद, स्पर्श (पण अगदी अतिंद्रिय) अनुभवाने साधकासमोर आविष्कृत होतो. देह, मन व बुद्धि सुद्धा जड असल्याने त्यांना आत्मदर्शनाची शक्ति नाही तर हे दर्शन होण्यासाठी प्रज्ञा लागते. तो प्रज्ञेचा अधिकार, सन्मान आहे.

अशी प्रज्ञा परिणत होण्यासाठी साक्षात्कारी संतांच्याकडून नाममंत्राची, सबीजनामाची, बीजाक्षराच्या अनुग्रहाची मोठीच आवश्यकता असते. असा अनुग्रह लाभला, साधकाने, सत्‌शिष्याने सबीजनामाचा स्वीकार केला, एवढ्याने संपत नाही तर सुरुवात होते. श्रीसद्‌गुरुवचनावर अविचल श्रद्धा ठेवावी. नेमाने निष्ठापूर्वक पालन, संकल्प-विकल्प, एवढच काय, ध्यानविरहित होण्यासाठी सतत स्वतःचे स्वतःच आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण करीत राहिले पाहिजे. श्रीमद्‌भगवद्‌गीता हेंच सांगते - "उद्धरेत्‌ आत्मन्‌ आत्मानं" त्यासाठी कथनी, करनी व रहनी यात एकवाक्यता फार फार मोलाची. ह्या त्रयीने अवघे जीवन व्यापलं पाहिजे.

यासाठी साधकाने, संसाराकडे विश्वस्त अगर साक्षी या नात्याने पहावे, म्हणजे मग संसाराचाच परमार्थ होतो. "दुःखांत सुख पाहावे", संसार दुःखमय आहे, तो भयग्रस्त आहे, तो मुळांत खोटा नाशवंत आहे, हे मनांत दृढ धरून मग संसार करावा म्हणजे तो बाधक नाही तर साधकच होतो. लाभ-तोटा, सुख-दुःख, यश-अपयश याकडे साक्षित्वाने पाहावे व निष्ठेने परमार्थ आचरावा. त्यातलं वर्म आहे - "मी देह नव्हे तर आनंदघन आत्माराम आहे" याची सतत आठवण असावी. 'जीवभावाचा शिवभाव करावा' त्यासाठीं काय करावे लागते ? सदा नामस्मरण करावे. 'देवा बरे झाले' असे अनुभवावे, खरे खरे सुख मिळते, खरी खरी शांती लाभते.

ज्ञान म्हणजे उपनिषदे, भगवद्‌गीता, ब्रह्मसूत्र, अकारादि प्रकरणादि ग्रंथ, भाष्य, टिका, वार्तिके, दर्शने, पुराणग्रंथ, संतसाहित्य यांचे शाब्दिक ज्ञान नव्हे. या शब्दज्ञानाला मग कांहीच मूल्य नाही कां ? तर आहे. या शाब्दिक ज्ञानाने काय होईल ? तर या शब्दज्ञानावर विश्वास असल्यास भगवंताच्या केवळ अस्तित्वाची खात्री होईल. फार फार तर साक्षात्काराच्या महाद्वारापर्यंत जाता येईल. पण आत्मसाक्षात्काराच्या गाभार्‍यात प्रवेश होणार नाही. म्हणून शब्दज्ञान हे ज्ञानच नव्हे, कां तर 'ज्ञान' ही एक परमविकसित अवस्था आहे. प्रत्यक्षानुभूती आहे. भगवंत बोलण्याची गोष्ट नाही तर तो प्रज्ञेनी अनुभवायचा आहे.

जी गोष्ट ज्ञानाचे तीच भक्तीची. भक्ति निष्काम असावी. एकनिष्ठ - अव्यभिचारी असावी. ही शुद्ध भक्तीची ठळक लक्षणे आहेत. अशा शुद्ध भक्तीची परिणती आत्मसाक्षातकारांत दर्शन, स्पर्शन, संभाषणादि अनुभूतीत होते. ही आवडीप्रमाणे सगुण किंवा निर्गुण अशा दोन्ही स्वरूपांत होते. प्रेमळ भक्ताला सगुणाचे प्रेमाबरोबर निर्गुणाचे ज्ञान असतेच, पण सगुणाचे विलक्षण प्रेम असते. भक्ति स्वयंफलरूप आहे म्हणून ती ज्ञानस्वरूपही आहे.

मग आपण काय करावे ? तर नामसाधना, नामस्मरण. दीर्घकाल, निरंतर व सत्कारयुक्त करीत राहावे. याने काय साधते ? तर हळूं हळूण् जीवभावाचा क्षय होतो व कमी होत होता त्याचाच मग शिवभाव होतो. देहबुद्धीची आत्मबुद्धि होते. या नामस्मरणांत निष्ठेबरोबर आर्जवाची मोठीच गरज आहे. आई लेकराला जेवायला घालताना किती आर्जव करते, तसेच नाम घ्यावे. अशा नामस्मरणाने भगवंत खुणा दाखवत असतो. त्या खुणा आपण ओळखाव्यात. तुकोबारायांच्या शब्दांत सांगायचे तर, "ओळखा रे वस्तू उघडा ज्ञान दृष्टी". आपण डोळे उघडे ठेवावेत, तो दाखवतो त्या खुणा ओळखाव्यात, या आनंदाच्या खूणा ओळखून नाम घेत राहावे.

अण्णा -

No comments: