15 December, 2008

रसो वै सः

रसो वै सः
:
तुकोबाराय भक्ताचार्य. निर्व्याज, निरंजन, दिव्य अशी भक्ति कशी प्राप्त करावयाची ? तर भक्ति म्हणजे खरोखरी अगदी नवीन, वेगळे असे काहीच करावयाचे नाही. फक्त आपल्या अंतःकरणाचे सर्वभाव आणि विचार हे एका भगवंताकडे वळवायचे. असं सर्वभावांनी, सर्वस्वी त्याच्याशी लगटून, त्याचेच होऊन राहणे हीच मंगलभक्ति.

अशी ही भक्ति परमप्रेमस्वरूप तर आहेच, पण अमृतास्वरूपाची सुद्धा आहे. भक्ताचार्यांनी भक्तीला उद्देशून 'रूप' आणि 'स्वरूप' असे म्हटले आहे. या दोन शब्दांत काही फरक आहे ? का एकाच अर्थाचे ? सामान्य व्यवहारांत हे दोन्ही शब्द एकार्थाचे वापरले जातात; पण भक्ति हे शास्त्र आहे. 'रूप' शब्दाने वस्तूचा रंग, आकार, उंची, भारमान, काठिण्य आदि बाह्य गुणांचा बोध होतो; तर त्या वस्तूच्या अंगभूत स्थायीभावाचे 'स्वरूप' या पदाने सुस्पष्ट होत असते. साधक भक्ति साधना करू लागला की त्याच्या आचार, विचार व उपासनेचे दर्शन इतरेजनांस/सर्वांना जाणवते. पण या परम प्रेमलक्षण भक्तीची सुधा (अमृत) जो प्रत्यक्ष भक्त चाखत असतो, त्यालाच त्याची अवीट गोडी कळते; इतरेजनांना नाही. पराभक्ति हे अमृत आहे. आणि ही भक्ति साध्य करून घेतलेला भक्त हा अमृतमयच नाही तर अमृतस्वरूप होतो.

अमृत म्हणजे काय ? जे मृत, नष्ट होत नाही ते अमृत. आत्मा/परमात्मा हाच एकमेव अमृत, अविनाशी आहे. म्हणून अशी भगवंताची परमप्रेमस्वरूपा भक्ति करणारा हा परमात्मस्वरूप, अमृतस्वरूप होतो.

अमृत म्हणजे मोक्ष, आपल्या समग्र भाव भावना, विचार व क्रियाव्यवहार यांचे शुद्धीकरण, उदात्तिकरण, आणि अध्यात्मिकरण करीत करीत साधकाला अपूर्णतेतूनच परीपूर्ण परमात्म्याकडे सुखरूपपणे घेऊन जाणारी प्रभावी शक्ति म्हणजे ही निष्काम, एकप्रवाही, परमप्रेमस्वरूप, अमृता भक्ति होय.

खरं सांगायचं तर अमृत म्हणजे अनुभवगम्य आनंदरस आहे. मात्र हा केवळ भौतिक, द्रवपदार्थ, रसायन नाही. तसेच सागर मंथनातून काढलेले (देव-दैत्यांनी) अमृतपण नाही. रस हा केवळ उपमेय भाव आहे. रस म्हणजे ब्रह्मरस, तथा भगवंताच्या परमानंदाचे अनुभवगम्य रसायन. भगवंत वस्तुतः रसमय आहे. भक्ताला अमृतरसपानाचे भाग्य लाभते. मग तो सर्वथैव आनंदातच राहतो, आनंदच होतो. आणि म्हणून द्रवीभूत ब्रह्मज्ञान, ब्रह्मरस म्हणजेच दुसरे तिसरे कांही नसून परमप्रेमस्वरूप भक्तिच.

या पराभक्तिच्या अमृतपानाने मत्त होऊन हरिनाम गात भक्त विश्वसंचार करतात आणि आपला स्वानुभवच जगाला सांगतात. नुसता सांगतात एवढेच नाही तर "सेवितो हा रस, वाटितो आणिका" अशा अवघ्या विश्वाला पाजतात.

भगवंत इतका रसमय, "रसो वै सः" की त्याच्यामुळे साहित्यातील असो वा स्वयंपाकातील असो सर्व रसांना रसत्व लाभते. तो रसराज आहे. मग त्याचे रूप, त्याचे नाम, त्याच्या लीला, त्याचे चरित्र केवढे रसाळ. नाम तर अमृताहूनी गोड त्या नामातून गळणारा रस अखंड सेवन करावयाचा, अमृतपान करायचं एवढंच भक्ताच काम.

अण्णा -


No comments: