16 December, 2008

मानसमणिमाला (१५)

:
मानसमणिमाला (१५)
:

हिंदी : जडचेतन दोषमय बिस्व कीह्न करतार ।
संतहंस गुन गहहिं पय, परिहरि बारि विकार ॥ बा. का. १.६
मराठी : जड चेतन गुणदोषमय कर्ता निर्मि जगास ।
संतहंस गुण घेति पय, त्यजुनि जला दोषास ।
अर्थ : परमेश्वराने जगाची निर्मिती केली तीच मुळात जडचेतनयुक्त आणि गुणदोषमय अशी आहे. यांचे अगदी एकजीव मिश्रण झालेले आहे. परंतु संत हे हंसासारखे (नीराक्षिर विवेकी) असल्याने गुणरूपी दुधाचा स्वीकार करतात व दोषरूपी जलाचा त्याग करतात.

विश्वनिर्मिती करताना परमात्म्यानें जड-चेतन व प्रकृतिजगत सत्त्व रज तम हे त्रिगुण यांच्या मिश्रणानेंच ती केलेली आहे. ज्यांना आपण गुण अगर दोष अशी लेबले लावतो ते या गुणमयी प्रवृत्तीचे वेगवेगळे आविष्कार, प्रगटीकरण आहे, व ते जसे आहे तसे ते संतांना स्वीकार्य आहे. त्यामुळे संत या प्रकृतीवर कधीही रुष्ट होत नाहीत तर नेहमीच त्या आविष्कारांचा सदुपयोग कसा करता येईल याचाच विचार करतात. ज्याअर्थी परमेश्वरानेंच त्या तथाकथित गुणदोषांसहित ही निर्मिती केली त्या अर्थीं त्यांचेही काही काही विशिष्ट कार्य भगवंताला अपेक्षित असणार. तो परमेश्वराचा उद्देश समजण्याकरिता समदृष्टि व उदार मन यांची आवश्यकता असते. कुणाचा व कशाचाही तिरस्कार, द्वेष अगर आसक्ति न धरतां ते ते कार्य समजून घेऊन त्याप्रमाणे व्यवहार करणे यालाच म्हणतात 'नीरक्षिरविवेक' ! संतांच्या जवळ ही सूक्ष्म दृष्टि असते त्यामुळे ते दुष्टांचा दुर्जनांचा त्याग करीत नाहीत तर त्यांचेसाठी अशी प्रार्थना करतात कीं 'खळांची व्यंकटी सांडो । विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो ॥' खळांच्या खल वृत्तीचा त्याग व त्यांच्या चैतन्यमयतेचा स्वीकार.

जड चेतनांच्या मिश्रणाबद्दल तर अधिकच गूढता आहे. शास्त्र असे सांगते कीं, "पूर्ण जडामध्येही चैतन्य असतेच व त्याचे प्रमाण :- जडांत १/३२, स्थावरांत १/१६ अंश, कीटक-पतंगादिकांत १/४ अंश, पशुपक्षी, मोठ्या प्राण्यांत ३/८, मनुष्यांत १/२, देवतांमध्ये ५/८ अंश व महासिद्धवंतांमध्ये १६ पैकी १० ते १२ अंश इतके असते. १६ पैकी १२ अंशांचे पुढे फक्त अवतारांमध्येच चैतन्याचा अंश असतो. प्रभु रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार असल्याने त्यांच्यात जडाचा अंश मुळीच नाही तर ते १६ कलांचे पूर्णावतार आहेत. म्हणून आपण प्रार्थना करायची कीं, 'अस बिबेक जब देई विधाता । सब तजि दोस, गुनहि मनुराता ॥' परमेश्वराने हा विवेक आम्हांस द्यावा, त्यामुळे दोषदृष्टी नाहीशी होऊन गुणांमध्येच मन रममाण होईल. - जय श्रीराम.

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: