27 December, 2008

मानसमणिमाला (१७)

मानसमणिमाला (१७)

:

हिंदी : लखि सुबेष जग बंचक जेऊ । बेष प्रताप पूजिअहिं तेऊ ॥ बा. कं १.६.५

उघरहिं अंत न होइ निबाहू । कालनेमि जिमि रावण राहू ॥ ६ ॥

किएहु कुबेष साधु सनमानू । जिमि जग जामवंत हनुमानू ॥ ७ ॥

मराटी : बघुनि सुवेषहि जग-वंचक जे । वेष बलें पुजिले हि जाति ते ॥ प्रज्ञा - बा. कां. १.६.५

बेंड फुटे अंति न निर्वाहू । कालनेमि रावण इव राहू ॥ ६ ॥

सन्मानहि कृत-कुवेष संतां । जगिं सम जांबवंता हनुमंता ॥ ७ ॥

अर्तः : जगाला फसविणारे जे लबाड लोक केवळ साधुवेष अगर उत्तम पोषाख (सुवेष) धारण करतात ते त्यांच्या बाह्यवेषाच्या प्रभावाने पूजिले जातात. परंतु त्यांची लबाडी, दंभ उघड होणारच. शेवटपर्यंत त्याचा उपयोग (निर्वाह) कधीच होत नाही. कालनेमि राक्षस, रावण किंवा राहू यांची लबाडी तात्काळ उघड झाली. साधूंचे मोठेपण बाह्य वेषावर अवलंबून नसते, त्यामुळे त्यांचा सामान्य पोषाख असला तरी त्यांना मान दिला जातोच. जांबवंत हनुमान यांची उदाहरणे स्पष्टच आहेत.

जगामध्ये चांगले वाईट, सज्जनपणा-दुर्जनता, श्रेष्ठ-कनिष्ठ यांची निवड करण्याचे माणसांचे ठोकताळे अगदी वरवरचे असतात. खरा नीरक्षिरविवेक फारच थोड्या जणांना करतां येतो. केवळ बाह्यांगावरून माणसे आपली मते तयार करतात व याचाच लबाड, संधिसाधू माणसे फायदा करून घेतात. 'दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते.' टापटीपीचा पांढरा शुभ्र पोषाख अथव भगवी वस्त्रे बघूनच माणसे आपली मते ठरवितात व त्या व्यक्तींना वंदन करण्यास धावतात. इतका जबरदस्त प्रभाव बाह्यांगाचा आणि पूर्वग्रहांचा आपल्या मनावर असतो आणि तो तात्कालिक नसतो तर बराच काळ टिकतो. तोपर्यंत लबाड स्वार्थी माणसे पद्धतशीरपणे आपले काम साधून घेतात. पण केव्हां ना केव्हां तरी ही लबाडी उघडकीस येतेच, व त्याची भरपाईही त्या लबाडांना करावी लागते. याची उदाहरणे आपल्याला पुराणांतून जशी मिळतात तशी रोजच्या व्यवहारांतही पदोपदी दिसतात. म्हणून माणसाने नेहमी सावध, दक्ष असले पाहिजे असे समर्थही सांगतात.

संतसज्जनांचे लक्ष सतत अंतरंगाकडे लागलेले असते त्यामुळे वेषभूषेला त्यांचे दृष्टीनें फारसे महत्त्व नसते. त्यांची राहणी साधारणतः साधीच असते त्यामुळे त्यांच्या मोठेपणाची कल्पना एकदम येत नाही. 'वेष असावा बावळा । परि अंतरी नाना कळा' अशीच स्थिती असते. श्रीगोंदवलेकर महाराज, श्रीगाडगेमहाराज अगर श्रीसाईबाबा यांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेतच. परंतु त्यांचे मोठेपण बाह्य परिस्थिती निरपेक्ष असल्याने झाकून राहाणारच नाही. त्यामुळेंच ते युगानुयुगे लोकवंदनास पात्र होतात.

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: