25 December, 2008

जडातून सूक्ष्माकडे

जडातून सूक्ष्माकडे

:

भगवंताचा साक्षात्कार नित्यनवा आहे, First hand आहे, second hand नव्हे. सर्व सामान्यतः सेकंड हँड देवच लोकांना माहीत आहे, असतो. दुसर्‍यांच्या अनुभवावरून आपण देवाची कल्पना करत असतो. 'उपनिषदांत असे सांगितले आहे", "गीतेत तसे सांगितले आहे" हेच सर्वसामान्यपणे बोलतात, बोलले जाते. अर्जुनाने विश्वरूपाचे वर्णन केले. आपण अनुभवलेल्या विश्वरूपाचे त्याने वर्ण न केले. त्याला आलेला अनुभव हा सर्वतोपरी first hand, नित्यनवा होता. यशोदेला आलेला विश्वरूपाचा अनुभवपण नित्यनवाच होता. आपला देवाचा नित्यनवा अनुभव सर्व संतांनी लिहून ठेवला. त्यांचे नुसते लिखाण वाचल्याने, त्यांच्या केवळ शब्दार्थाने आपल्याला जो आनंद होतो तो जर अमर्याद, अलौकिक, अगदी आगळा वेगळा असतो, तर प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव किती श्रेष्ठ नाही का ?


देवच देवाला पाहू शकतो. आत्मारामालाच आत्मारामाचे दर्शन होते. जनक राजाच्या दरबारांत पंडितांची चर्चा चालू होती. त्य चर्चेत याज्ञवल्यांनी तेथे जमलेल्या सर्वच्या सर्व पंडितांना हरवले. शेवडी जनक राजाशी त्यांचा वाद सुरूं झाला. "कुंभारांनी केलेल्या मडक्याला कुंभाराचे ज्ञान होते कां ?" असा प्रश्न जनकांनी विचारला. प्रश्न अति महत्त्वाचा आहे. जो परमार्थप्रेमी आहे, परमार्थ पाहण्याची ज्यांना तीव्र तळमळ आहे, त्यांच्यापुढे हा प्रश्न आलाच पाहिजे. "होय, कुंभाराला जाणण्याची शक्ति घटाला आहे. [कुंभार म्हणजे परमात्मा, घट म्हणजे जीव] या आपल्या देहांतच असणार्‍या आत्म्यालाच परमात्मा जाणण्याची शक्ति, युक्ति, बुद्धि आहे. "ती किमया आत्मस्वरूपाशिवाय इतर कोणालाच नाही" असे याज्ञवल्क्यांनी जनकराजास मोठे छान, खरे खरे अचूक उत्तर दिले.


आत्मारामाच्या या क्रियेला dichotomy हा शब्द तत्त्ववेत्यांनी वापरला आहे (म्हणजे एकाचे दोन होणे). एकाचे असे दोन होण्याचे सामर्थ्य फक्त आत्मारामातच आहे. आता एकाचे दोन होतात म्हणजे "आत्मा निम्मा निम्मा झाला" असे वाटण्याचीच शक्यता जास्त नाही कां ? पण ते तसे नव्हे. dichotomy म्हणजे पाहणा व दिसणारा दोघें एकच एक असतात. म्हणूनच स्वप्नांतूनपण अद्वैताचा अनुभव येतो. एकाचे दोन होणे, म्हणजे आरशांत आपण आपल्याला पाहिल्यासारखे नव्हे. आरशातील प्रतिबिंब विकृत असते (उजव्याचे डावे तर डाव्याचे उजवे). जशाचे तसे दिसण्याचे सामर्थ्य फक्त एका आत्मारामातच आहे. हे स्व-स्वरूपाचे ज्ञान कुणाला होते ? आत्म्याचा अनुभव केवळ आत्मारामालाच.


हा आत्मसाक्षात्कार मग कोणाला ? देहाला की आत्मदेवाला ? "मी देव पाहिला" आपण सहज बोलून जातो. त्यांनी देव पाहिला, असेही आपण सहज बोलून जातो.


हा देह जड आहे, तर आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे ? बरं शब्दांनी सांगायच झालं तर एका खसखशीच्या दाण्याचे १००० भाग करावेत व त्यातील १/१००० श भागाची विभागणी पुनः १००० भागांत करावी (त्याला 'रेणू' म्हणतात). आत्मा त्यापेक्षांही सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. अशा सूक्ष्मतम आत्मारामाचे ज्ञान या जड देहाला कसे होणार ? जडाला सूक्ष्माचे ज्ञान होणे कधीच शक्य नाही. जडाने जडाला जड माध्यमांतूनच जडाचेच ज्ञान होते. सूक्ष्म कळणार नाही.


पण या जड देहात एक चैतन्य आहे,. एक शक्ति आहे, एक आनंद आहे. त्याला मग तुम्ही काहीही नाव द्या. याला आत्मा असं शास्त्रकार म्हणतात. सारांश काय तर जड इंद्रियांना देव कळत नाही. मग मनाला कळतो कां ? तर मनाचा डोळा पण देव पाहू शकत नाही. मन पण जडच आहे; तर आत्मचक्षूच आत्मारामाला, देवाला जाणूं शकतात, पाहू शकतात.


बुद्धीला देवाचं ज्ञान होऊं शकतं का ? बुद्धिला गुरुदेव 'lower intellect' खालच्या पातळीची बुद्धि अस म्हणत असत. या बुद्धीला फक्त देवाचे अस्तित्व कळते. तेवढाच या बुद्धीचा उपयोग. म्हणून आपल्या बुद्धीने देवाच्या महामंदिराच्या दरवाजापर्यंत जाता येते. म्हणून मनाने बुद्धीने कळणार नाही, वाचेने सांगता येणार नाही.


मग इंद्रियांना दिसत नाही, बुद्धीला कळत नाही, मनाला कल्पना/ आकलन करता येत नाही, असा हा देव आहे तरी कशावरून ? देव हे काय गौडबंगाल, किमया, जादू आहे ? तर देवाचा साक्षात्कार हे 'intuitive apprehension' आहे. ते प्रतिभ दर्शन आहे, इंद्रियजन्य, बुद्धिगम्य अगर मानसिक नाही, तर प्रज्ञा दर्शन आहे. याला लागणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभ शक्ति. त्याला आत्मदृष्टि, आत्मशक्ति असे पण म्हणताता. गुरुदेव त्यालाच intuition असं म्हणत.


मग नामाचा काय उपयोग ? नामाने काय होते ? तर नामाने देवाला जाणण्याची ही आपल्यतीलच गुप्त, निद्रित असणारी शक्ति नामस्मरणाने जागृत होते. याच शक्तिला योगशास्त्रांत कुंडलिनी म्हणतात. भक्तिशास्त्रांत प्रेमभाव म्हणतात, तर माधुर्यभावांत याच शक्तीला राधा असें म्हणतात.


अण्णा -

No comments: