29 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २३

गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः ।
निमिषोऽनिमिषः स्रग्वी वाचस्पतिरूदारधीः ।।
(२०९) गुरुः :  - शिक्षक किवा आचार्य. जो आपल्या शिष्यांना पूज्य धर्मग्रंथातील गूढार्थाचा उपदेश करतो त्याला गुरू असे संबोधिले जाते. स्वतः परमेश्वर हाच सर्व वेदांचा कर्ता, उद्गाता व ज्ञाता असल्यामुळे सर्व वेदांताच्या अध्यापनांतही तोच गुरू असतो. आत्मा हाच सर्व प्रकाशक असल्यामुळे मानवी गुरूंचे ज्ञानही तोच प्रकाशित करतो. त्याची शिष्याला शिकविण्याची, सांगण्याची कला तसेच शिष्याची ऐकण्याची, समजून घेण्याची व ते सत्य आत्मसात करण्याची बुद्धिही तोच प्रकाशित करतो (कार्यान्वित करतो). म्हणूनच ज्ञानदानाची प्रक्रिया जिथे जिथे चालते तेथे तोच एकमेव गुरू असतो.
(२१०) गुरुतमः :  - महान गुरू. ज्याने प्रजापती ब्रह्मदेवाला चारही वेदज्ञानाचा उपदेश केला, ज्ञानसाधना करावयास प्रवृत्त केले. तो महत् गुरू प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. सृजनशक्ति असलेल्या त्या पहिल्या दिव्यज्ञान साधकाला जो परमतत्वाचा अनुभव आला तो त्या परब्रह्मावाचून कुणीही दे शकणार नाही. त्यानंतर ज्या दिव्य ज्ञानी मानवांना सत्यज्ञान झाले त्यांनी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे साहजिकच पुढील शिष्यांची अशी मनोमन श्रद्धा असते की आपल्या गुरूंनीच आपल्याला सत्यदर्शन घडविले. परंतु सार्वकालिन सत्य हेच आहे की वेदांनी प्रतिपादिलेला अंतिम साक्षात्कार हा शेवटी सत्य प्रकटनातूनच होतो व त्याचा प्रत्यक्ष गुरूशी अगर कुठल्याही धर्मग्रंथाशी कांही संबंध नसतो. श्वेताश्वतर उपनिषद म्हणते (६- १८) ज्याने प्रथम सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाची उत्पत्ति केली व त्याला वेदज्ञान दिले तो (गुरू.)
     गुरू, तत्वज्ञानाचे ग्रंथ, परमेश्वराची भक्ती, ध्यान, सदाचरण आणि धर्मतत्वांचे आचरण (किवा उपासना) ह्या सर्वांची आवश्यकता आहे, कारण त्यामुळे साधकाचे अंतःकरण अंतिम सत्याचे दर्शन घेण्याकरतां तयार होते. परंतु शेवटचा साक्षात्कार हा केवळ परब्रह्मामुळेच होतो. म्हणूनच तो परब्रह्म स्वरूप 'श्रीविष्णु' हा श्रेष्ठ गुरू आहे.
     एकाद्या वस्तुची गुरूता (जडपणा - वजन) दर्शवण्याकरतांही 'गुरूत्व' हा शब्द वापरला जातो व त्या दृष्टिने पहाता परमात्मा हा सर्व गुरू वस्तूमध्येही गुरू (जड) आहे
(२११) धाम :  - अंतिम ध्येय. सर्व तीर्थयात्रांचे पवित्रतम शेवटचे गंतव्यस्थान. ते परब्रह्म हेच परमधाम आहे, व ज्या ध्येयाला पोहोचल्यावर पुढे कुठेही जावयाचे शिल्लक रहात नाही असे हे निरपवाद पूर्णत्व म्हणजेच शेवटचे शिखर अगर धाम होय. संस्कृतमध्ये धाम ह्या शब्दाचा दुसरा अर्थ 'तेज'. 'शुद्धज्ञान' हे सर्व अनुभवांचेही प्रकाशक असल्यामुळे त्याची 'सर्व प्रकाशांचा प्रकाश' अशी स्तुती केली आहे. [1]
(२१२) सत्यः :  - जो स्वतःच सत्य स्वरूप आहे असा. सर्वसाधारणपणे सत्य हा शब्द जसा वापरला जातो त्यापेक्षा वेगळया अर्थी हा शब्द इथे वापरला आहे. तो म्हणजे जे भूत भविष्व वर्तमान ह्या तीही कालांत विकाररहित  (परिवर्तनरहित ) असते ते सत्य. 'सत्यं ज्ञांनं अनंतम ब्रह्म ! अशी उपनिषदांची  घोषणा आहे. बृहत् उपनिषद् म्हणते ''हे प्राण सत्य आहेत व तो प्राणांचेही  सत्य आहे. (४-१-२०)
(२१३) सत्यपराक्रमः :  - गतिमानसत्य. निष्क्रिय सत्यप्रियता हे मुर्खांचे आश्रयस्थान आहे किवा भित्र्या लोकांची लपण्याची गुहा (पळवाट) आहे. आत्मघातकी, पूर्णतः असत्य किवा अपराधपूर्ण लबाड व्यवहार ह्यापेक्षा ते काही प्रमाणात ठीक आहे परंतु परमात्मा हा केवळ सत्यस्वरूपच होऊन राहिलेला नाही तर तो गतिमान सत्यस्वरूप आहे. त्यामुळे सत्याच्याच नेहमी विजय होतो, असत्याचा कधीही होत नाही हेच सिद्ध होते. (सत्यमेव जयते् न अनृतम्)
     गुरूत्वाकर्षण हा निसर्गाचा नियम आहे व तो सर्व ठिकाणी खरा आहे इतकेच नव्हे तर त्या नियमातून कुणीहि, सुटू शकत नाही किवा त्या नियमांचा भंग करू शकणार नाही हेही निसर्ग बघतो. त्याचप्रमाणे सुसंगती व अमर्याद प्रेम हे अपरिहार्य सत्य आहे व ते जीवनामध्ये सदैव दृढमूल झाले आहे. म्हणूनच परमात्मा 'सत्यपराक्रम' या नावांने संबोधिला जातो.
(२१४) निमिषः :  - डोळयाच्या पापण्या मिटणे ह्या स्थितीला निमिष असे म्हणतात. व पापण्या उघडणे ह्या स्थितीला म्हणतात अनिमेष. जेव्हा डोळे उघडे असतात तेंव्हा मन बहिर्गामी होते. मनाची अंतर्मुखता ही डोळयांच्या अभावितपणे मिटण्याशी सुसंगत असते कारण जेव्हा मनुष्य खोल विचारांत गढलेला असतो, एकादी गोष्ट आठविण्याचा प्रयत्न किवा मनन करत असतो तेंव्हा त्याचे डोळे सहजच मिटलेले आपण पहातोच.
     खोल ध्यान मग्न अवस्थेत बुद्धि तिच्या सर्व अनुभवजगतापासून आंत वळलेली असते. अंतःकरणाला आंत व बाहेर एकाच दिव्य वस्तूचा अनुभव येत असतो तो परमात्मा ह्या ठिकाणी निमिष ह्या शब्दांनी निर्देशित केला आहे कारण तो स्वतःच स्वतःमध्ये ध्यानमग्न आहे. त्याचे दृष्टीने पाहतां सर्व सृष्टिच्या उभारणीमध्ये आंतबाहेर त्याच्याखेरीज दुसरे कांहीच नाही अशी स्थिती असते.
(२१५) अनिमिषः :  - ज्याची दृष्टि पापण्यांची उघड झाप न झाल्यामुळे स्थिर आहे असा. जेव्हा आपण पापण्यांची उघड झाप करतो तेंव्हा दोन्ही डोळयांच्या पापण्या एकाच वेळी बंद होतात. आणि दृष्य वस्तूवर एकतर्‍हेचे आवरण पडून बघणारा वस्तू बघू शकत नाही. ह्याठिकाणी अ निमिष या संज्ञेने असे सुचवायचे आहे की ज्ञानवान आत्मा सर्वकाळ ज्ञाताच असतो. ( द्रष्टुः दृष्टेः अविपरिलोपात् पश्यन्नेव भवति ) श्री शंकराचार्यांच्या छांदोग्य भाष्यातील शब्द असे आहेत '' ज्ञात्याच्या ज्ञान प्रक्रियेत केव्हाही खंड पडत नाही.''
(२१६) स्रग्वी :  - स्रक् म्हणजे माला. अर्थात स्रग्वी शब्दाचा अर्थ होइल जो कधीही न कोमेजणार्‍या फुलांची माला सतत परिधान करतो तो. विष्णुची सुपरिचीत माला वैजयंती होय.
(२१७) वाचस्पतिरूदारधीः :  - जो जीवनाचे महान तत्वज्ञान प्रसृत करण्यामध्ये वक्तृत्वशाली आहे त्याला वाचस्पती असे संबोधिण्यात येते. धी म्हणचे बुद्धिची शक्ति. उदारधी म्हणजेच त्याची बुद्धी उदार आहे असा. जो आपल्या मतांचे बाबतीत दुराग्रही नाही असा. म्हणून संपूर्ण संज्ञेचा अर्थ असा होईल की, 'परमात्मा केवळ जीवनाचे तत्वज्ञान देणाराच नव्हे तर त्याचे जवळ अत्यंत विशाल हृदयही आहे ज्यामुळे तो मायेच्या क्रीडेमुळे मोहित झालेल्या साधकांच्या मन बुद्धितील त्रुटी समजू शकतो व त्यामुळे तो माणसांचे गुणदोष सहानुभुती पूर्वक सहन करतो. म्हणूनच पतितांच्या बद्दल परमेश्वराच्या मनांत अपार करूणा असते असे म्हटले जाते.
     निसर्गाचे व सृष्टिचे नियम हे अंध व तडजोड न करणारे असे असतात. त्या उलट धार्मिक नीतीनियम मनुष्य पुष्कळ काळपर्यंत कुठलेही कडक शासन न होता डावलू शकतो. अग्निचे जवळ कसलीही दया बुद्धि नाही. परंतु परमेश्वर आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान उत्तम सतत तर्‍हेने सांगत असतानांही त्याचे हृदय करूणामयच असते. आपल्या उदार बुद्धिने व मात्यापित्याच्या ममतेनें मनुष्यांचे नीतिमर्यादा सोडून वागणे तो सहन करतो.

डॉ. सौ. उषा गुणे


[1]   नारायणोपनिषद म्हणते - नारायण परमज्योती स्वरूप आहे. तर मुंडकोपनिषद म्हणते परब्रह्म हे परिपूर्ण आहे.

No comments: