17 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २०

महेष्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः ।
अनिरूद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदां पतिः ।।
(१८१) महेष्वासः :  - ज्याने शारङ्ग नांवाचे धनुष्यधारण केले आहे असा.
(१८२) महीभर्ता :  - धरणी मातेचा पति. संस्कृतमध्ये पति या अर्थी भर्ता हा शब्द वापरला जातो. व त्याचा अर्थ होतो भरण पोषण करणारा, आधार देणारा. पुराण वाङ्‌मयातील वचनानुसार पृथ्वीला त्यानें प्रलयजलातून वर काढले होते. तत्वज्ञानाचे दृष्टीने पाहीले असतां सोने त्याच्यापासून तयार केलेल्या सर्व आभूषणाचा आधार असते त्याप्रमाणे परमतत्वापासून निर्माण झालेल्या ह्या विश्वाला आधार तोच आहे. पृथ्वीचा अगर पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा आधार तोच आहे त्यामुळेच त्याला पृथ्वीचा आधार पती (भर्ता) म्हटले आहे.
(१८३) श्रीनिवासः :  - श्रीचे म्हणजेच लक्ष्मीचे अक्षय्य आश्रयस्थान. या ठिकाणी 'श्री' या शब्दामध्ये सर्व ऐश्वर्य व शक्ती, व धर्मास अनुसरून केलेले सर्व सृजनकार्य, त्याकरतां लागणारी शक्ति व पात्रता या सर्वांचा अंतर्भाव केला जातो. लक्ष्मी केव्हा ही एकाचएक स्थानांत स्थिर रहात नाही. सर्व इतिहासामध्येही आपल्याला दिसते, की मोठमोठें साधुसंतही वेळ प्रसंगी पूर्णतेच्या बाबतीत तडजोड करतात. परंतु श्री नारायणाचे प्रशांत अंतःकरण हे एकच स्थान असे आहे की ज्या ठिकाणी अपूर्णतेचा थोडाही उपसर्ग होवूं शकत नाही. म्हणूनच लक्ष्मीचे तेथे सतत वास्तव्य असते. व त्या करितांच महाविष्णुला 'श्रीनिवास' असे संबोधिले जाते.
(१८४) सतांगतिः :  - सत् पुरूष आणि परमार्थ साधकांचे ध्येय- गंतव्य. गीतेमध्ये यालाच परागति असे म्हटले आहे. गति ह्या शब्दाने केवळ ध्येयाचाच निर्देश अपेक्षित नाही तर प्रत्यक्ष ध्येयाकडील वाटचाल व दिशा यांचाही त्या शब्दांत अंतर्भाव केलेला आहे. श्री नारायण हाच साधकांकरितां प्रत्यक्ष दिशा, मार्ग, प्रगती व ध्येय आहे.
(१८५) अनिरूद्धः :  - ज्याला कुणीही कधीही विरोध करू शकत नाही, अडवू शकत नाही असा. सर्व निर्मित जडचेतन वस्तूमध्ये केवळ परमात्म्याची इच्छाच अप्रतिहतपणे कार्य करते आहे. ज्याप्रमाणे दृश्य जड जगतामध्ये निसर्गाचेच नियम अविरोधपणे कार्य करीत असतात, त्याचप्रमाणे सत्याचे सुसंवादित्व व लयबद्धता आपल्या अहेतुक प्रेमाने व पूर्णतेच्या दिशेने सतत प्रगत होत असते. काल व गती कोणाही करीता थांबत नाहीत. जेव्हा सूर्य उगवतो तेंव्हा सर्व प्राणी सृष्टी त्याच्यापासून शक्ति व उर्जा स्विकारते व ह्या प्रक्रियेमध्ये कुणीही अडथळा आणू शकत नाही. त्याचप्रमाणे आत्मतत्वाच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण प्राकृतिक सृष्टि स्पंदन पावू लागते व प्रत्येक घटक कार्यरत होतो. या सर्व प्रयत्‍न व साक्षेपामध्यें, त्यांच्या यश अपयशामध्ये, सुखदुःखामध्ये ते आत्मतत्व आपल्या मोहमयी सौंदर्यासहित नित्य उपस्थित असते. तरीही ते त्यांत समाविष्ट होत नाही. रासक्रिडेमध्ये गोपींना आपल्या स्वतःच्याच नृत्यामध्ये पूर्णता व समाधान मिळते स्वतः भगवान् त्यापासून पूर्ण अलिप्तच असतात.
पुराणांमध्ये असे आढळते की भगवान विष्णुंनी अनेक अवतार घेतलेले आहेत व त्यामध्ये वेगवेगळे आकार धारण केलेले आहेत. सर्व अवतारांमध्ये ते विजयीच झालेले आहेत, ह्याकीरतां त्यांची शक्ति अनिरूद्ध आहे असे म्हटले जाते.
(१८६) सुरानंदः :  - स्वर्गामध्ये वस्ती करणार्‍या देवानांही जो आनंद प्रदान करतो तो. तो पूर्णब्रह्म परमात्मा स्वतः पूर्णानंद स्वरूपच आहे असे विधान आपण उपनिषदांमध्ये वाचतो. ''आनन्दं ब्रम्हेति व्यजानात्'' तैतिरीयोपनिषदातील आनंदवल्लीमध्ये तर आनंदाचे गणिती पद्धतीनें विधान केले आहे व ऋषींनी असा निष्कर्ष काढला आहे की स्वर्ग-पृथ्वीवरील सर्व मानसीक, अतिमानसिक एकत्रित केलेला आनंदही केवळ त्या परमानंदाच्या एका लहानशा किरणाचे लुकलुकणे होईल. असा तो परमात्मा 'महाविष्णु' होय.
(१८७) गोविन्दः :  - संस्कृतमध्ये गो या शब्दाचे चार अर्थ होतात. ते म्हणजे १) पृथ्वी, २) गाय, ३) वाणी ४) वेद
(१) अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तुमात्रास ज्याप्रमाणे पृथ्वी आधार देते त्याप्रमाणे मानवांच्या सर्व आंतरिक घटकांना आधार देणारा तो गोविंद. (२) ज्यानें गाईंचे रक्षण केले तसेच गोकुळांत वास्तव्य करून गोपाळांची भूमिका वठविली तो गोविंद. तोच मनुष्यांच्या अंतःकरणातील पाशवी बुद्धि व वासना काबूमध्ये ठेवतो. (३) ज्याच्या वाचून कुठेही कोणाच्याही मूखातून केंव्हाही शब्द स्फुरण पावू शकत नाहीत तो गोविंद. केनोपनिषद म्हणते ' सर्व प्राणीमात्रातील[1] चैतन्य तो स्वतःच असल्यामुळे वेदांनी वर्णिलेले, उदघोषित केलेले सत्य म्हणजेच सर्वोकृष्ट वाणी केवळ त्याच्याच मुळे अस्तित्वात आली आहे. (४) त्या वेद वाणीचा उद्‌गाता तोच आहे. व वेदांचा मुख्य विषयही परमात्मा 'श्रीविष्णु' आहे.
(१८८) गोविंदांपतिः :  - मंत्रद्रष्टे ऋषी अगर प्रज्ञावान (गोवित्) महात्म्यांचा स्वामी. गो म्हणजे वेद व ते जाणणारा तो गोविद् किवा वेदविद्. वेदांनी उदघोषीत केलेले अंतिम सत्य ज्यांनी स्वतःच्या अंतःकरणांत आत्मस्वरूपाने अनुभविले आहे, ( साक्षात्कार केला आहे) ते गोवित्- वेदविद्. त्यांना द्रष्टेऋषी म्हटले जाते. अशा प्रज्ञावान द्रष्ट्या ऋषींचा परमात्मा श्रीविष्णु हाच स्वामी अगर पति आहे.

डॉ. सौ. उषा गुणे


[1]   यत् वाचा नाभ्युदितं येन वागभ्युद्यते । तदेवब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते ॥ केन उप. १.४

No comments: