श्लोक ९२
धनुर्धरो धनुर्वेदो
दण्डो दमयिता दमः ।
अपराजितः सर्वसहो
नियन्तानियमोयमः ।।
(८५७) धनुर्धरः :
- धनुष्य धारण करणारा.
रामावतारामध्ये त्याने कुणीही धारण केले नाही असे
भव्य धनुष्य धारण केले. उपनिषदांमध्ये एक प्रसिद्ध धनुष्यरूपक आहे. त्यामध्ये
जीवात्मा हा बाण असून तो ब्रह्मरूपी लक्षापर्यंत जावून त्याच्याशी भिडतो असे वर्णन
आहे. मुंडकोपनिषदामध्ये ऋषी म्हणतात 'प्रणवो धनुः'[1]
(८५८) धनुर्वेदः :
- धनुर्वेदाचा उद्गाता. आत्मस्वरूपाचे ज्ञान होण्याकरतां ज्याने
'प्रणवाचे ध्यान' रूपी अमोघ विद्या निर्माण केली तो धनुर्विद्यानिर्माण कर्ता
श्रीनारायणच होय.
(८५९) दण्डः :
- जो दुष्टांना शिक्षा करतो असा. भगवत् गीतेमध्ये भगवान म्हणतात सर्व
विश्वास नियमित करणारा (शासक) दंड मीच आहे.[2]
तसेच हा दंड 'राजदंड' असल्यानें त्याचा सर्वाधिकार सुचवितो. या अनंत
विश्वामध्ये श्रीनारायण हा राजांचाही चक्रवर्ती राजा
असल्यानें सर्वाधिकाराचा राजदंड तोच धारण करतो.
(८६०) दमयिता :
- दमन - शासन करणारा. तो दुष्टांना शासन करतो. पाप्यांचा नाश करतो. व विश्वामध्ये चैतन्य निर्माण
करतो, जोपासतो. त्यामुळे अध्यात्म्याचे
सौंदर्य असलेली फुले फुलतात, विश्वाची जीवनरूपी
बाग फुलते.
(८६१) दमः : - लौकीकातील
विषयांचे दमन केल्याने शेवटी प्राप्त होणारा आत्मस्वरूपाचा, मोक्षाचा अनुभव श्रीनारायणच
आहे.
(८६२) अपराजितः :
- ज्यास कोणीही पराभूत करूं शकत नाही असा. नित्य विजयी. प्रत्येकाचे हृदयांत स्थित असलेले आत्मतत्वच
अंतर्यामातून प्रकट होत असते. व तेच शेवटी विजयी होऊन आध्यात्मिक मूल्ये प्रस्थापित करत असते. इतर सर्व पराभूत होतात व
आत्मतत्त्वच विजयी ठरते.
(८६३) सर्वसहः :
- जो समर्थपणे संपूर्ण विश्वाचा भार सहन करतो तो. सर्वसह श्री नारायण होय. तो
दुष्प्रवृत्तीरूपी शत्रूंना व वैषेयिक वासनांना समर्थपणे पराभूत करतो.
'माती' हे जसे घटाचे उपादान कारण आहे त्याप्रमाणे सर्व विश्वाचे उपादान कारण होऊन विश्वाचा भार सहन करतो.
(८६४) अनियन्ता :
- ज्याचेवर कुणीही नियन्ता (शासक) असू शकत नाही असा. त्यानेच विश्वाचे नियमन करण्याकरतां
चंद्र, सूर्य, वायू, जल इ. शासक नेमलेले आहेत.
(८६५) अनियमः :
- जो इतर कुणाच्या नियमनाखाली असत नाही असा. कारण तोच
एकमेव सर्व नियमांचा कर्ता आहे व स्वतःच नियमही आहे. त्याच्याच समर्थ बाहूंमध्ये निसर्गाचे
अपरिवर्तनिय व अबाधित नियम निर्माण करण्याची व प्रवर्तित करण्याची शक्ती आहे.
(८६६) अयमः : -
ज्यास मृत्यु माहितच नाही असा. तो अमर असल्यानें त्याला मृत्यू कसा येईल ? मृत्यू तत्व त्याचेवर प्रभाव करू शकत नाही. परिवर्तन
अगर मृत्यूचे कार्य कालामध्येच चालते. शुद्ध चैतन्य हेच कालाची जाणीव प्रकाशित
करते. त्यामुळे ते कालातीतच आहे - अमृत्यू आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.
[1]
ॐकार हा मंत्र हेच एक धनुष्य आहे. आत्मा हा बाण आहे. ’ब्रह्मन्’
हे लक्ष्य आहे. ज्याने स्वतःस ध्यानाने एकाग्र केले आहे त्यानें हा बाण सोडावयाचा
आहे. मनानें स्वतः शरवत् होऊन हा बाण सोडला असता तो ब्रह्माशी एकरूपच होऊन जातो.
धनुर्गृहित्वौपनिषदं महास्रम् - उपनिषदांनी दिलेले हे महान् अस्र, धनुष्य उचलून व
त्यामध्ये सतत ध्यानाने तीक्ष्ण केलेला बुद्धीरूपी बाण लावून व मनाने ब्रह्म हेच
लक्ष्य निश्चित करून त्यावर सोडावे.
[2]
दण्डो
दमयितामस्मि ।
No comments:
Post a Comment