03 January, 2008

स्वानंद

स्वानंद


अपेक्षा करणे चूक नाही पण आग्रह धरणे चुकीचे आहे - "नहि स्वात्मारामं विषय मृगतृष्णा भ्रमयन्ति". स्वात्माराम तृप्त आहे, तो परिपूर्ण आहे, याचा अर्थ काय आहे ? जीवनाचे खरे लक्षण कय आहे ?

पण अंतर्मुख होऊन आत बघितले पाहिजे. पण आपण बघतो बाहेरच. ज्या सुखाकरितां या जगांत रात्रंदिवस आपण धडपडतो, त्या ऐवजी आपण जर आपल्या आतमध्ये जे सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे, त्याच्या किंवा त्याला अनुभवण्याची कला जर आपण शिकून घेतली तर सार्थकच झाले. अष्टौप्रहर, बारा महिने, तेरा काळ आनंदच आनंद-स्वानंद. कारण आपल्या आत आहे तो नुसता दाशरथी राम नाही तर तो स्वानंदाभिराम आहे. हा केवळ नंदलाल नसून आनंदलाल आहे बघ.

भगवत्‌नामाचे तात्पर्य तरी काय आहे ? नामाची व्याख्या अशी आहे, "आपण आपल्या मनाने नामाचा हात धरून चारी वाणींच्या पायर्‍या उतरून आपल्या अंतःकरणात उतरायचे, की जेथे परमानंदाचा अक्षय खजिना आहे". हा परमानंद खंड भोगण्याचे नाव म्हणजे "नामसाधना".

पण केवळ आपल्या मनाच्या सहाय्याने, परा, पश्यन्ति, मध्यमा, व वैखरी या चार वाणींच्या पायऱ्या उतरून आत खोलवर जाऊ शकत नाही. मग याला काही उपाय आहे की नाही ? तर त्याला एकच एक उपाय आहे - "नाम". नाम हीच एक अशी वस्तू आहे, असे तत्त्व आहे, की एका वाणीतून दुसर्‍या वाणीत उतरता उतरता ते आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाते.

म्हणूनच असे आत आत उतरण्याकरितां, अवघ्या विश्वात पसरलेले आपले जे मन आहे, त्या मनाला आत ओढून घेऊन भगवत्‍नामाशी बांधून मग त्या मनाला आत सोडायचे. तरी ते उसळ्या मारून वर वर येण्याचा प्रयत्न करतेच, पण नामाच्या वजनाने, नाईलाजाने कां असेना, पण त्या मनाला आंत उतरावेच लागते. आंत भगवंताचे - आपल्या श्रीगुरुंचे अधिष्ठान आहे. जिथे भगवंत प्रत्यक्ष आपल्या अनुभवास येतो, त्या परावाणीच्या ठिकाणी भगवंताचे अखंड अनुभव घेत घेत आनंदाने, महानंदाने, ब्रह्मानंदाने समृद्ध, समर्थ जीवन जगणे हेच नामसाधनेचे अमृतफळ आहे.

ज्ञानेश्वर महाराज तर ज्ञानीयांचे राजे, योगीराज, तत्त्वज्ञानी, संजीवन समाधीचे सम्राट आणि स्वानंदसाम्राज्याचे सार्वभौमचक्रवर्ती असे असूनही आपल्या 'हरीपाठांत' काय म्हणाले तर, "हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ "

किती सोपे सांगितले ना ? पण या सोप्यालासुद्धा आपण उपाधी लावून त्याला उगीचच जास्तीत जास्त आवघड करून टाकतो. एक सांगतो बघ - श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी एकाला नाम सांगितले. तोही घेऊं लगला मोठ्या श्रद्धेने, प्रेमाने. सहा महिने झाले. एक दिवस आला महाराजांकडे, म्हणाला - "महाराज गुडघे फार दुखतात, मांड्या भरून येतात". महाराज म्हणाले, "कां, कशाने दुखतात ?" त्याने काय म्हणावे. म्हणाला, "बद्धपद्मासन घालून बसतो". महाराज म्हणाले, "मी तसे सांगितले होते कां ?" तो म्हणाला, "मग मी कोणत्या आसनावर बसून जप करूं ?" महाराज म्हणाले, "तुम्ही प्रपंचाचा विचार करता, चिंता करता, काळजी करता, ती कोणत्या आसनावर बसून ?? "

चोवीस तास नाम घ्यावे. कशाला त्या कष्टप्रद आसनाची उठाठेव, नाही का ? "निजल्याने गाता उभा नारायण । बैसल्या कीर्तन करिता डोले ॥". म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले ? तर 'हरि मुखे म्हणा'. हरि-राम-कृष्ण या तिन्ही नामाचा भाव एकच आहे. "रामकृष्णहरि"

एक नाम घेतले ना, पुरे झाले. अन्य काही आटापिटा नको. ते नाम आपल्याला वाणीच्या पायर्‍या उतरून आंत नेईल आणि भगवत स्वरूपाचा साक्षात्कार म्हणजे आनंदाची-स्वानंदाची अनुभूती देईल. ही जबाबदारी दिव्य नामाची; ज्यांनी / श्रीगुरुंनी आपल्या नाम दिलेले असते, त्यांची. आपण काय करावयाचे तर नाम घेत रहावयाचे. कसे ? कुठे ? तर, "आसनी शयनी भोजनी उठता बसता येता जाता काम करता करता. अगदी भांडतांना कांडतांना सुद्धां". एक नाम आणि नाम. आपण नाम घ्यावे. काळजी 'तो' करतो.

-- अण्णा

2 comments:

Shyam said...

aanna tumhi kharokharich atyaanand dilat tumchyaashi parichay hone aawdel

रामदास ढोरमले said...

श्री आण्णांचे विचार म्हणजे एक ब्रम्हानंदाची अनुभूती असते.