15 January, 2008

मकरसंक्रांत

मकरसंक्रांत

आज मकर संक्रमण. संक्रमण म्हणजे स्थित्यंतर, स्थानांतर, अवस्थांतर. तीळ शर्करा, वाण-वसा हा अधिभौतिक भाग. जीवदशा ओलांडून शिवदशा अनुभवणे हे अवस्थांतर. त्यासाठी उपासना म्हणजे भगवंताची प्रेमलक्षणा परमप्रेमस्वरूप भक्ति. भक्तिरसायनाचा सुमधुर पाक. भगवद्‌दर्शनाच्या उत्कट आचेवर, जीवरूप तिळावर हळूवारपणे चढवता चढवता अष्टसात्त्विक भावाचा छान काटा येतो ढळतो, येतो ढळतो, आणि होता होता जीवाचे रुपांतर दाणेदार, शुभ्र, स्निग्ध, मधुर हलव्याच्या रुपाने शोभू लागतो.

भक्तिसाधक हा (किंवा ही) कोणीही असो ९९% संसारीच असतो. तो लोकांमध्येच राहतो, वावरतो आणि जीवन व्यवहार करत असतो. त्यामुळे त्याच्या जीवनक्रमावर अगदी सहजच, स्वाभाविकपणे अनेक लौकिक बंधने पडत असतात. तथापि भगवद्‌प्राप्ती हेच ध्येय निश्चित करून, निरलसपणे, निष्ठेने एकविधभावाने, कांही काळ (कित्येक वर्षेसुद्धा) साधना केल्यानंतर मात्र त्त्याच्या स्थितीत असा फरक पडावयास हवा की इतरेजनांच्या आवडी निवडीपेक्षा आपली आवड वेगळ्या स्वरूपाची आहे; हळूहळू हा फरक लक्षात येतो. नंतर तर एक अशी स्थिती येते की लौकिकाचा संसर्गही सहन होईनासा होतो. एक प्रकारचा भिन्न भिन्न मनोवृत्तींचा सरळ विरोध (Temperamental confilict) उद्‍भवतो. अशावेळी तळमळीच्या साधकाने काय करावे ? आपले भगवद्‍प्राप्तिचे ध्येय सोडून इतरेजनांप्रमाणेच वर्तावे काय ?
काही झाले तरी भगवद्‍प्राप्ति साधावयाचीच असा दृढ संकल्प करावा. मग कायावाचामने एकच एक हरिभक्ति करावी. आपले सर्व अवधान एकमात्र हरिभक्तिकडेच केंद्रित करावे. हाच स्वधर्म. भगवंताच्या भक्तिप्रेमाच्या तुलनेत लौकिक, व्यावहारिक गोष्टी या दुय्यमच. म्हणून एक ऐकांतिक परमप्रेमलक्षण भक्तिचीच कास धरावी. कांही लौकिक सोडाव लागला तरी चालेल. प्रसंगी निंदा, चेष्टा, कुचेष्ट सुद्धा होईल. पण ते सर्व मनोधैर्याने सहन केले पाहिजे. ' हे करूं का ते करूं ' असा धर-सोडपणा सोडला पाहिजे. भगवान सांगतात " अर्जुना ! सर्वधर्मान्‌ परित्यज्य मां एकं शरणं व्रज ॥ "

मात्र लौकिक टाकायचा तो कांहीतरी लोक विलक्षण, सनसनाटी, प्रसिद्धी यासाठी नाही. समाज धारणेसाठी कर्तव्यविचार आचार आवश्यकच आहे. पण ते पाळीत असताना एक श्रीहरि हाच आचार, विचार, उच्चार व व्यवहार करावा. " बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥ "

No comments: